शिर्डी : ‘झिरो बजेट नैसर्गिक (अध्यात्मिक) शेती प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून पद्मश्री सुभाष पाळेकर यांनी देशभरात शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण केली आहे. कृषी क्षेत्रात दुसऱ्या हरितक्रांतीची आवश्यकता असून, ही क्रांती झिरो बजेट नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून होणे शक्य आहे,’ असे प्रतिपादन नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार यांनी व्यक्त केले.
येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था यांच्यातर्फे श्री साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या झिरो बजेट नैसर्गिक (अध्यात्मिक) शेती प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. कुमार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे हे होते.
या वेळी शिबिराचे मार्गदर्शक व व्याख्याते पद्मश्री सुभाषजी पाळेकर, आंध्रप्रदेश येथील शेती सल्लागार टी. विजयकुमार, आमदार स्नेहलता कोल्हे, संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, विश्वस्त भाऊसाहेब वाकचौरे, विश्वस्त तथा नगराध्यक्षा योगिता शेळके, नलिनी हावरे, उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, मनोज घोडे पाटील, उपकार्यकारी अधिकारी बाबासाहेब घोरपडे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी डॉ. कुमार म्हणाले, ‘देशाला दुसऱ्या हरितक्रांतीची गरज आहे, परंतु ती कशी करायची हा प्रश्न आहे, त्याला झिरो बजेट शेती हा समर्थ पर्याय आहे. हा विषय पर्यावरणाशी निगडीत आहे. आपल्याला पारंपरिक पद्धतीत बदल करावे लागतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे असे ध्येय आहे. या ध्येयासाठी पाळेकरांच्या झिरो बजेट नैसर्गिक शेतीद्वारे शक्य आहे. अनेक राज्यांतील शेतकऱ्यांनी या झिरो बजेट नैसर्गिक शेतीची सुरुवात केली असून, या शेतीतील क्रांतीची सुरुवात शिर्डीत होत आहे. आज रासायनिक खतांच्या वापराने पंजाबमध्ये शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून, मानवी शरिरालाही धोका पोहचला आहे. विषयुक्त अन्न सेवनामुळे कॅन्सरचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शिर्डी येथे श्री साईबाबांच्या दर्शनासाठी वर्षाकाठी साडेतीन ते चार कोटी भाविक येतात, त्यांनाही झिरो बजेट नैसर्गिक शेतीची माहिती होण्यासाठी छोटी माहितीपत्रके वाटप करण्यात यावी.’
पद्मश्री पाळेकर म्हणाले, ‘सध्याच्या पारंपरिक शेतीमध्ये रासायनिक खताच्या व किटकनाशकाच्या वापराने शेतीची सुपीकता घटत चालली आहे. कॅन्सर, मधुमेहसारख्या घातक रोगांचे प्रमाण वाढत आहे. आपल्या देशात कृषी वैज्ञानिक याबाबत योग्य मार्गदर्शन करत नाही. यासाठी झिरो बजेट नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून आम्ही आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मेघालय या राज्यांमध्ये शेतकऱ्यांमध्ये जागृती करून नैसर्गिक शेती जन आंदोलन उभे केले आहे. आंध्रप्रदेशात सुमारे पाच लाख शेतकरी यात सहभागी झाले असून, येत्या तीन वर्षांत पूर्ण राज्यात झिरो बजेट नैसर्गिक शेती होईल. यासाठी तेथील राज्य सरकारने ही या चळवळीत सहभाग घेतला आहे. नीती आयोगाच्या बैठकीमध्ये या चळवळीबाबत चर्चा झाली आहे. आम्हाला कर्जमाफी नाही, तर कर्जमुक्ती हवी आहे. झिरो बजेट शेतीतून उत्पादन खर्च शून्य होणार असून, उत्पन्न दुप्पट होईल. कर्जच घेतले नाही, तर कर्ज फेडण्याची गरज पडणार नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी झिरो बजेट शेती हाच एक पर्याय आहे.
या प्रसंगी बोलताना संस्थानचे अध्यक्ष डॉ. हावरे म्हणाले, ‘श्री साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित या शिबिरास राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी उपस्थित असून, यामध्ये तरुणांची संख्या उल्लेखनीय आहे. शेतकऱ्यांचे जीवन अतिशय कष्टमय आहे. झिरो बजेट नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून पाळेकर यांनी ऐतिहासिक काम सुरू केले असून, नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून शेतीचा खर्च शून्य झाला, तर नुकसान होणार नाही. यासाठी या चळवळीला प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे. म्हणूनच दरवर्षी श्री साईबाबा संस्थानच्या वतीने झिरो बजेट नैसर्गिक शेती प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येईल. महसूल कृषी व बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील हेही या शिबिरास भेट देणार असून, त्यांच्या या भेटीतून राज्य शासनाकडून निश्चितच या चळवळीस प्रोत्साहन मिळेल. या शिबिरात सुमारे पाच हजार ५०० शेतकरी यात सहभागी झाले असून, या सर्व शिबिरार्थींना श्री साईबाबा संस्थानतर्फे योग्य त्या सुविधा दिल्या जातील.’
या वेळी आंध्रप्रदेशातील शेती सल्लागार टी. विजयकुमार, आमदार स्नेहलता कोल्हे, विनिता कातकडे आदींनी मनोगतं व्यक्त केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माधवराव देशमुख यांनी केले. संस्थानचे उपाध्यक्ष कदम यांनी आभार मानले. या कार्यक्रमास कोपरगांव साखर कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे, अशोक रोहमारे, वाल्मिकराव कातकडे आदी मान्यवर उपस्थित होते.